राज्यात आजपासून पुन्हा जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या बहुतांश भागात अजूनही पाऊस गायब आहे. त्यामुळे जलस्त्रोतांसह शेतीसही पावसाची अत्यंत गरज आहे. खरीप शेतीवर विपरित परिणाम होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. राज्यातील काही भागात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 14 सप्टेंबरपर्यंत नाशिक ते कोल्हापूरपर्यंतच्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता आहे. मुंबईपर्यंत संपूर्ण कोकणात जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. राज्यात चांगला पाऊस नसल्याने अनेक प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.