अपंगांसाठी प्रेरणादायक व्यक्तिमत्व ठरलेल्या नसीमा हुरजूक या मुळच्या सोलापूर जिल्ह्यातील आहेत. सन 1984 मध्ये आपल्या मित्र-मैत्रिणींना सोबतीला घेऊन अपंगांना सहाय्यभूत ठरेल, अशी ‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डीकॅप्ड, कोल्हापूर’ ही संस्था सुरू केली. जागतिक अपंगदिनाचे औचित्य साधून 3 डिसेंबर, 2020 रोजी ‘साहस डिसॲबिलीटी रिसर्च आणि केअर फौंडेशन,कोल्हापूर’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थांच्या माध्यमातून धिक व्यापक प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्र व शेजारील राज्यांच्या ग्रामीण भागात त्यांनी अपंग बांधवांसाठी कार्य करण्यास सुरुवात केली.
या संस्था समाजात दुर्लक्षित राहिलेल्या अपंग बांधवां कार्य करतात. त्यांना मूलभूत सहाय्य पूरविले जाते. तसेच त्यांना विविध कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविले जाते.
डॉ. नसीमा मोहम्मद अमीन हुरजूक यांचा जन्म २ सप्टेंबर १९५० रोजी झाला. वयाच्या १६ व्या वर्षी पक्षाघातामुळे त्यांच्या कंबरेखालील भागाच्या सर्व संवेदना नष्ट होऊन त्यांना अपंगत्व आले. त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी ‘अर्थशास्त्र’ विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन घेतली. त्यानंतर त्यांनी ‘केंद्रीय अबकारी कर’ या सरकारी विभागात काही काळ नोकरी करून मग स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.
अपंगांना आवश्यक ती वैद्यकीय मदत मिळवून देता यावी, तसेच त्यांना स्वबळावर स्वावलंबी आयुष्य जगता यावे हे या संस्थेचे ध्येयआहे. सन १९९३ साली त्यांनी व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. सन १९९६ साली ‘घरोंदा’ वसतिगृह व पुनर्वसन केंद्राची स्थापना केली. सन २००० मध्ये अपंग विद्यार्थ्यांना एकत्र शिक्षण घेता यावे यासाठी ‘समर्थ विद्यामंदिरा’ची स्थापना केली. सन २००१ साली सिंधुदुर्गातील कुडाळ येथे काजू प्रक्रिया प्रकल्प व वसतिगृह असलेल्या ‘स्वप्ननगरी प्रकल्पा’ची स्थापना करण्यात आली
नसीमा हुरजूक यांनी अपंगांसाठी भरीव कार्य केले आहे. हजारो अपंगांना या संस्थांच्या माध्यमातून प्रेरणा दिली आहे. कित्येकांना स्वबळावर उभे केले आहे. नसीमा हुरजूक यांचे ‘चाकाची खुर्ची’ पुस्तक प्रसिद्ध आहे. आपला एवढा भव्य जीवनप्रवास त्यांनी चाकाच्या खुर्चीवरुन केला आहे. या पुस्तकात हा प्रवास उलगडून दाखविला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दिल्लीच्या अपंग कल्याण फेडरेशनचा राष्ट्रीय पुरस्कार, सन १९८९-९० मध्ये कोल्हापुरातील सर्वोत्कृष्ट स्त्री उद्योजक, सन १९९८-९९ मध्ये पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकडून ‘बाया कर्वे’ पुरस्कार, सन २००१ मध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या उद्देशाने दिला जाणारा भारत सरकारचा राष्ट्रीय स्तरावरील ‘आदर्श व्यक्ती’ पुरस्कार, सन २००२ मध्ये कोल्हापूर-भूषण पुरस्कार, आदी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.