रयत शिक्षण संस्था

शिक्षणाशिवाय बहुजन समाजाची प्रगती होऊ शकणार नाही, हे ओळखून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’, ‘कमवा आणि शिका’ हे या संस्थेचे मुलमंत्र आहेत. या संस्थेतून अनेक विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे गाठली आहेत. या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे आहे .कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्यामधील काले या गावी एका मेळाव्यामध्ये बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी ‘रयत शिक्षण संस्था’ ही शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात यावी, असा ठराव मांडला. ४ ऑक्टोबर १९१९ रोजी विजयादशमीला काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. रयत शिक्षण संस्था ही एक भारतीय शैक्षणिक संस्था आहे. ज्या विद्यार्थ्यांना पूर्वीच्या काळात शिक्षणाची संधी नव्हती, अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हे त्याचे उद्दीष्ट होते.

काही प्रमुख उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून रयत शिक्षण संस्थेने आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. बहुजन समाजामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करुन ती वाढवणे, मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे, निरनिराळ्या जातीधर्मातील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे, अयोग्य रूढींना फाटा देऊन खऱ्या विकासाचे वळण लावणे, एकीचे महत्त्व कृतीने पटवून देणे, सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनविण्याचा प्रयत्न करणे, बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल, तेव्हा संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे, ही या संस्थेची उद्दिष्ट्ये आहेत. सन १९२४ साली रयत शिक्षण संस्थेचे कार्यालय सातारा येथे नेण्यात आले. या संस्थेची महाराष्ट्रात महाविद्यालये, माध्यामिक विद्यालये, मुलांसाठी वसतिगृहे, उच्च माध्यमिक विद्यालये, शेती महाविद्यालये, तंत्र विद्यालये, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, डी.एड. महाविद्यालये, प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळा, शाळेतील मुलांसाठी ६८ वसतिगृहे, ८ आश्रमशाळा, ५८ आयटीआय व इतर संस्था आहेत.

सुरुवातीला कर्मवीर शिकवण्या घेत. त्यांनी शिकवणी वर्ग सुरू केले हळू-हळू मुले वाढत गेली.महिन्याला त्यांना ९० ते ९५ रुपये मिळू लागले. साताऱ्यात भाऊरावांना ‘अण्णा पाटील’ म्हणून ओळखू लागले. भाऊराव पाटील हे महात्मा फुले यांना आपला आदर्श मानत. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला. आपल्या वक्तृत्वगुणांमुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यावेळी समाज प्रबोधनासाठीच्या जवळपास सर्वच कार्यक्रमांमध्ये भाऊरावांनी सहभाग घेतला. रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे आहेत. संस्थेच्या तब्बल 739 शाखा असून त्यामध्ये सुमारे 16 हजार 172 कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या सुमारे 4 लाख 50 हजार विद्यार्थी रयत शिक्षण संस्थांच्या विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. रयत शिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार संस्थेच्या 438 शाळा ,17 शेतकी शाळा, 42 महाविद्यालय, 80 वसतीगृहे तसेच 8 आश्रमशाळा आहेत.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *