महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात अनेक संस्था कार्यरत आहेत. या संस्थांचे या क्षेत्रात अनमोल योगदान आहे. कोल्हापूरमध्ये दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा ही एक साहित्य संस्था आहे. या संस्थेची स्थापना २५ मे १९८२ रोजी झाली. महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये विशेषकरुन ही कार्य करते. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर हे चार जिल्हे या संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा या संस्थेला महाराष्ट्र सरकारच्या साहित्य संस्कृती मंडळाकडून दरवर्षी ५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. ही संस्था या चार जिल्ह्यांतील एखाद्या गावी साहित्य संमेलने भरवते. संस्थेची आतापर्यंत कोल्हापूर, बेळगाव, निपाणी, सांगली, कुंभारगाव, येडेनिपाणी, नागठाणे, रेणावी-सांगली अशा विविध ठिकाणी साहित्य संमेलने झाली आहेत.
या संमेलनाचे बाबा कदम, गौतमीपुत्र कांबळे, प्रमोद कोपर्डे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. चंद्रकुमार नलगे, रंगराव बापू पाटील, वसंत केशव पाटील, डॉ. गंगाधर पानतावणे, आनंद यादव, फ. मु. शिंदे आदींनी आतापर्यंत संमेलनाध्यक्षपद भूषवले आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि मिरज पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथे सन २०१३ मध्ये एक विद्यार्थी साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्षपदी पेठ शिवापूर येथील विद्यार्थीनी होती. या संस्थेने सांगली जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेसह जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन जानेवारी २०१९ मध्ये साहित्य संमेलन घेतले. ही संस्था साहित्य क्षेत्रात विविध उपक्रम राबवीत असते. विद्यार्थी, तरुणांना प्रोत्साहन देत असते. वेगवेगळी सांहित्य संमेलने आयोजित करुन साहित्य प्रसार करते. या संस्थेचा लौकिक आजही कायम आहे.