राज्यातील सर्व माध्यमे व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी नऊ किंवा नऊनंतर ठेवावी, अशी सूचना शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आली आहे. विभागामार्फत अभ्यास करुन तज्ज्ञांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निर्देशानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणप्रेमी, पालक तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे.
शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या व शाळांच्या वेळा समांतर येणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक आहे. शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा विचार करावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे. मुलांची झोप सकाळी पूर्ण न झाल्याने त्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे. पालकांच्या मते, पाल्याची झोप सकाळी पूर्ण न झाल्याने ते शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात. ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो. हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे अवघड होते. पावसामुळे व थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होऊन ते बहुदा आजारी पडतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल, त्यांनी त्यांच्या अडचणींबाबत मार्गदर्शन देऊन सोडविण्याची तजवीज करावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे.