अनाथ मुलांच्या समस्येबाबत जनजागृती आवश्यक
सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे व जीवन संवर्धन फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे राष्ट्रीय स्तरावरील बेघर कार्यशाळा झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. या परिषदेचा विषय ‘फ्रॉम स्ट्रगल टू स्ट्रेंथ नेविगेटिंग आणि नेटवर्किंग फॉर होमेलेस चिल्ड्रेन’ हा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अनाथ मुलांसाठी विशेष प्राधान्य असावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले. त्यांनी मुलांची बेघर होण्याची विविध कारणे सांगितली.
लहान मुलांच्या संदर्भात काम करणाऱ्या शासकीय व सेवाभावी संस्था यांच्या कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण करणे, लहान मुले व महिलांच्या कायद्याबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. अनाथ व बेघर मुलांची अनेकदा तस्करी होते. या मुलांचा अनेक घातक व्यवसायात कामगार म्हणून वापर केला जातो. मुलींना पळवून नेले जाते. त्यांचे विविध प्रकारे शोषण केले जाते. याबाबत समाजामध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. गिरीष प्रभुणे, रवींद्र गोळे, डॉ. गणेश भगुरे, कमलेश प्रधान उपस्थित होते.