लातुरमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा आढावा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि उद्योग विभागाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा आढावा घेण्यासाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत लातुरने राज्यात सर्वप्रथम दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 762 नवउद्योजकांना कर्ज उपलब्ध करून त्यांना उद्योग उभारणीसाठी सहाय्य केले आहे. लातूर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या कार्यपद्धतीचा ‘लातूर पॅटर्न’ आता राज्यातही राबविण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, नितीन वाघमारे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महासंचालक प्रवीण खडके, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, विविध बँकांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील उद्योजकांशी मंत्री उदय सामंत यांनी शासकीय विश्रामगृह येथे संवाद साधला. यावेळी उद्योजकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी मांडल्या. या समस्या सोडविण्यासाठी एमआयडीसी मार्फत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती त्यांनी उद्योजकांना दिली. काही प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले.
मंत्री सामंत म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील अतिरिक्त औसा, उदगीर आणि जळकोट येथील एमआयडीसीला उच्चाधिकार समितीची मंजुरी मिळाली आहे. लातूर अतिरिक्त एमआयडीसी तसेच विमानतळासाठी जमिनीच्या भूसंपादनाचा विषय मार्गी लावण्याकरिता लवकरात लवकर शेतकऱ्यांसोबत बैठक घेवून निर्णय घ्यावा. जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधा निर्मितीचा सूक्ष्म कृती आराखडा सादर करावा.