मुलांना समजून घ्या

आजकाल आई-वडील अर्थात पालक आपल्या मुलांबद्दल खूप संवेदनशील झाले आहेत. आपली मुले इतरांच्या मुलांपेक्षा प्रत्येक गोष्टीत पुढे आणि चांगली असावीत असे त्यांना वाटते. अनेकवेळा पालक नकळत अशा अनेक गोष्टी आपल्या मुलांसमोर करतात, ज्याचा मुलांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होतो. ही बाब पालकांच्या लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे मुलांचे आणि पालकांचे नातेसंबंध बिघडू लागतात.

मुलांवर अधिकार गाजवणे हे कुणालाही त्रास देऊ शकते. लहान मुलांवर त्याचा कसा नकारात्मक परिणाम होतो हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. पालकांची अधिकार गाजविण्याची सवय मुलांना एकटे राहण्यास भाग पाडू शकते. मुलांना दमदाटी करताना पालक काही वेळा आपल्या मुलांना इतरांसमोर लाजवतात. याची साधी कल्पनाही पालकांना नसते. कधीकधी ते त्यांची चेष्टाही करतात. अनेकवेळा ते काही विचार न करता मुलांना बोलतात. याचा थेट परिणाम मुलांच्या मनावर होतो. आपणही हे करीत असाल तर आजच कधीही, कुणाहीसमोर दमदाटी करण्याची सवय बदला.

 

अनेकवेळा पालकांना समजत नाही की, त्यांच्या मुलामध्ये आत्मविश्वास का कमी आहे. वास्तविक, हा त्यांच्या संगोपनाचाच एक भाग आहे. पालकसुद्धा आपल्या मुलांमधील कमतरता चारचौघांमध्ये व्यक्त करतात. त्यामुळे अप्रत्यक्षपणे मुले स्वतःला कमी लेखू लागतात. आई-वडील मुलांच्या भावना समजून न घेता त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना काय करावे आणि काय करू नये, हे सांगू लागतात. याचा थेट परिणाम त्यांच्या मनावर होतो. काही पालक मुलांना सर्वांसमोर ते शिव्या देतात, मारतात आणि धक्काबुक्कीही करतात. हे पालकांच्या लक्षातही येत नाही. मात्र याचा थेट परिणाम मुलांच्या मनावर होतो. अशा परिस्थितीत, पालकांनी प्रथम संस्कार आणि चांगल्या सवयी शिकणे महत्वाचे आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *