मूग

मुगाच्या पिकासाठी जास्त पाऊस हानिकारक असतो. ज्या भागात ६० ते ७५ सेमी पाऊस पडतो, तो कालावधी मूग लागवडीसाठी योग्य आहे. या पिकाला उष्ण हवामान लागते. मुगाची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे केली जाते, मध्यम चिकणमाती, पाण्याचा योग्य निचरा होणारी चिकणमाती त्यासाठी उत्तम आहे.
मुगाच्या शेतीसाठी सर्वप्रथम शेतजमीन तयार करावी लागते. शेताची पहिली नांगरणी नांगराच्या सहाय्याने करावी ज्यामुळे माती चांगली फिरते. यानंतर मशागतीने दोन-तीन नांगरणी करून जमीन चांगली बारीक करुन घ्यावी. शेवटच्या नांगरणीमध्ये लेव्हलर वापरणे महत्वाचे आहे, यामुळे शेतातील ओलावा दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते.
‘पुसा’ , ‘बैसाखी’, ‘मोहिनपंत’, ‘वर्षा’, ‘सुनयना’, ‘जवाहर’ या मुगाच्या काही जाती आहेत. खरीप हंगामात १२ ते १५ किलो प्रति हेक्टरी मूग बियाणे लागते. प्रति किलो ३ ग्रॅम थायरम बुरशीनाशक बियाण्यांवर प्रक्रिया केल्याने बियाणे आणि मातीजन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण होते. तसेच जमिनीत नत्राचे स्थिरीकरण करण्यासाठी ६०० ग्रॅम रायझोबियम कल्चर व २५० ग्रॅम गूळ एक लिटर पाण्यात टाकून गरम करावे. थंड झाल्यावर हे बियाणे प्रक्रिया करून सावलीत वाळवून पेरणी करावी. असे केल्याने नत्राचे स्थिरीकरण चांगले होते. खरीप व रबी या दोन्ही काळांमध्ये पेरणी वेगवेगळ्या वेळी केली जाते. खरिपात पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत करावी. रबीमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणी करावी.
खते वापरण्यापूर्वी मातीची चाचणी घ्यावी. मूगासाठी २०किलो नायट्रोजन, ४० किलो स्फुरद, २० किलो पालाश, २५ किलो गंधक आणि ५ किलो झिंक प्रति हेक्टरी लागते. खरीप पिकाला सिंचनाची गरज नसते, परंतु फुलोऱ्याच्या अवस्थेत दुष्काळ पडल्यास सिंचनाची गरज असते. असे केल्याने उत्पन्न वाढते. खरीप पिकामध्ये पाऊस असल्याने मूग तयार होण्याच्या वेळी एक पाणी द्यावे लागते. रबी पिकामध्ये पहिले पाणी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी आणि त्यानंतर दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने द्यावे; जेणेकरून चांगले उत्पादन मिळू शकते. मूग काळे होऊन कोरडे पडल्यावर पिकाची काढणी करावी. खूप कोरडे झाल्यास मूग तडकण्याची भीती असते. मळणी किंवा काडीच्या साहाय्याने मूग मिळवले जातात.