मराठी मालिकांचे प्रेक्षक भारी चोखंदळ असतात. आता टीआरपीत अव्वल असणाऱ्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील चूक विशेषकरून नेटकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. थेट या मालिकेची नायिका सायली अर्थात जुई गडकरीलाच प्रेक्षकांनी प्रश्न विचारला आहे.
अर्जुन आणि सायली एका वर्षाचा करार करुन विवाहबद्ध झाले आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांचा विवाह दाखविला होता. त्यानंतर त्यांनी होळी, गुढीपाडवा हे सण साजरे केले. आता वर्षभराने पुन्हा एकदा मालिकेत हे सण साजरे होताना दिसत आहेत. असे असताना सायली आणि अर्जून मात्र विवाहास वर्ष झाले नसल्याचे बोलत असतात.
जुईने इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी एका सेशनचे आयोजन केले होते. तिला एका चाहत्याने विचारले की, ‘कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला एक वर्ष झाले नाही, पण होळीला झाले. हे कसे काय?” त्यावर जुई म्हणाली की, ‘गंमत त्यानंतरच आहे हो. बघा की दोनदा होळी. मला खात्री आहे तुम्हाला पुढील ट्वीस्ट नक्की आवडतील’. अर्थात, चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली नाही.. फक्त चूक दाखवून दिली, एवढेच.