मनोहर-मनसंतोष गड

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘मनोहर-मनसंतोष गड’ हा एक सुंदर किल्ला आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी जे चार घाट आहेत, त्या सर्व घाटांवर किल्ले आहेत. यातील आंबोली घाटात मनोहर-मनसंतोष हा एक बलदंड किल्ला आहे.

या गडावर जाण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेठशिवापूर आणि शिरशिंगेजवळून रस्ता आहे. यातील पेठशिवापुरास जाण्यासाठी सावंतवाडीहुन मुक्कामास जाणाऱ्या एस.टी. ची सोय आहे. या गाडीने रात्रीच गावात जाता येते. सकाळी गड चढता येतो. दुसरा रस्ता सावंतवाडी-आंबोली रस्त्यावरील शिरशिंगे या गावातून जातो. येथे पोहोचताच मनोहर आणि मनसंतोष गडाचे मोहक दर्शन होते. मोठा असणारा मनोहरगड असून लहान असणारा मनसंतोषगड आहे.
जसेजसे आपण गड चढू लागतो, तसतसे आंबोली खोऱ्यामधील विहंगम दृश्य पहायला मिळते. साधारण तेथून दीड तासाच्या चढाईनंतर मध्येच पेठशिवापुराहून येणारी वाट येऊन मिळते. त्यानंतर अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण किल्ल्याच्या तटबंदीपाशी पोहचतो.

मनोहरगडावर साधारण पन्नास पायऱ्या चढून गेल्यावर किल्ल्याचा उद्ध्वस्त दरवाजा दिसतो. आत शिरल्यावर एक भक्कम बुरुज दिसतो. इथे तटामध्ये एक गुप्त दरवाजा आहे. डावीकडील वाटेने गेल्यास भलामोठा चौथरा आणि त्यावर बांधलेली इमारत दिसते. या इमारतीच्या जवळ औदुंबराचे एक झाड आहे. या झाडाच्या खाली भैरोबांच्या मूर्ती आहेत. याला लोक ‘गडाचा चाळा’ म्हणतात. येथे स्थानिक युवक आवर्जून एकत्रितपणे फिरायला जातात.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *