जोखीम तर सर्वत्रच असते

नोकरी सुरक्षित आहे-व्यवसायात जोखीम आहे, असा समज अजुनही आपल्याकडे आहे. त्याच वातावरणाचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो. आपल्या मुलांनी सुरक्षित पर्याय निवडावा असे पालकांना वाटणे स्वाभाविक आहे; पण म्हणून व्यवसाय करू पाहणाऱ्या मुलांना नाराज करू नये.
व्यवसायामध्ये जोखीम आहे हा समज तसा खोटा आहे. इतर सर्वच क्षेत्रात ज्या प्रमाणात जोखीम असते त्याच प्रमाणात ती व्यवसायातही आहे. जोखीम नाही असे क्षेत्रच आपल्याला सापडणार नाही. स्वतःच व्यवसायाची सुरूवात करणार असल्याने एक संस्थापक म्हणून पाहिजे तसा व्यवसाय स्वतः उभारू शकतो. एक चांगला उद्योजक आपल्या क्षमतेचा अंदाज घेऊन किती जोखीम घ्यावी हे ठरवीत असतो. त्यामुळे जसे दाखविले जाते तेवढी जोखीम व्यवसायात निश्चितच नाही.
व्यवसायात करिअर करणे हे सुद्धा तेवढेच रोमांचक व खूप काही देणारे असते. करिअरमधील जोखीम गृहीत धरूनसुद्धा जेवढ्या लवकर तुम्ही व्यवसाय सुरू कराल तेवढे ते फायद्याचे ठरते.
गुंतवणुकीच्या संदर्भात विचार केला तर प्रत्येक व्यवसायासाठी खूप मोठी गुंतवणूक लागतेच असे नाही. कमी भांडवलातही व्यवसाय सुरू करता येतो. तुमचा मुलगा जेवढ्या लवकर सुरूवात करेल तेवढी त्याला गुंतवणूक कमी लागेल. व्यवसाय सुरू झाल्यावर जसे पैसे यायला लागतील तसे पैसे तो पुन्हा व्यवसायात वापरू शकतो.
व्यवसाय चालविताना खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन करणे आणि ते जमणे हे खूप महत्त्वाचे आहे. ते चक्र सुरळीत सुरू झाले की व्यवसाय सुरळीत चालतो आणि व्यवसाय वाढविण्यासाठी त्याचा फायदा होतो
या विषयांवर आपल्याकडे आता चर्चा होते, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे पालकांची चिंता समजून घेत मुलांनी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलून आपली इच्छा समजावून सांगावी. ते नक्कीच पाठिंबा देतील. मुलांनी मोठे व्हावे, प्रगती करावी हीच पालकांची इच्छा असते.