विविधरंगी-विविधढंगी शेती

शेती म्हणजे विविध पिकांची लागवड केली जाणारी जमीन असे सर्वसाधारण म्हणता येईल. शेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येते. स्थूलमानाने नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारांत बदल होतात. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भातशेती, पशुधनप्रधान शेती, मत्स्यशेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्धा अस्तित्वात आले आहेत. मानवी जीवनात शेती हा खूप महत्त्वाचा हिस्सा आहे. भारतामधील. नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक हे वर्षावर्षाला बदलत नाहीत. त्यांच्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हवामान, जमीन आणि भूरचना हे होत. एखाद्या विशिष्ट विभागात कोणते पीक येऊ शकेल, हे या घटकांवर अवलंबून असते.
भात शेती व उष्ण कटिबंधातील फळबागांची शेती कोकणात शक्य आहे. तेथील हवामान भात, आंबे, नारळ, काजू, सुपारी, मसाल्याची पिके याच्या उत्पादनाला पोषक असते. नवीन संकरित जातींमुळेही हवामान, जमीन व भूरचना यांना योग्य अशी पिके आता घेता येतात.

पिके आणि शेतीचा प्रकार हे जमीन व भूरचना यांवर अवलंबून असतात; परंतु या घटकांना जर पर्जन्यमानाचीही जोड मिळाली तर त्यांचे परिणाम अधिक उठावदार दिसतात. खोल, सुपीक व सपाट जमीन असेल, पाऊस भरपूर व चांगला विभागून पडणारा असेल तर तेथे शेतीची भरभराट झालेली आढळते. डोंगराळ व पुरेशा पर्जन्यमानाच्या प्रदेशात गवताळ राने मुबलक असल्याने अशा ठिकाणी सर्वसाधारणपणे कुरणशेती, वनशेती, गवतशेती किंवा पशुधन प्रधान शेती फायदेशीर ठरते. माफक खोलीची जमीन व तुटपुंजा पाऊस असणाऱ्या प्रदेशांत दुर्जल शेती किंवा जिराईती शेतीशिवाय पर्याय नसतो.
एकेरी पिकाची शेती भारतात फारशी रूढ नाही. याला कारणेही वेगवेगळी आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे भारतातील शेती ही प्राधान्याने उदरनिर्वाहाच्या हेतूने करण्यात येणारी असून शेकऱ्याचे जमीनधारणेचे परिमाण अल्प आहे. शेतकऱ्याला आपल्या लहानशा शेतीच्या तुकड्यात कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक अशी जवळजवळ सर्व प्रकारची उत्पादने काढावी लागतात. सुदैवाने भारतातील हवामान, काही थोडे प्रदेश वगळता, बहुतेक ठिकाणी वर्षभर शेती करण्याला पूरक असे आहे. कोकण विभागातील भात शेती हा एकच आणि जवळजवळ एकेरी पीक पद्धतीसारखा आहे. अमेरिकेसारख्या देशात जमीनधारणेचे परिमाण खूप मोठे असून विशेषीकरणही उच्च दर्जाचे असते. तेथे गहू, कपाशी, मका, गवत इत्यादींची एकेरी पीक पद्घत रूढ आहे. अर्थात तेथील हवामान बाराही महिने शेतीला पूरक नाही हेही लक्षात घ्यायला पाहिजे.
बहुविध पिकांची शेती
ही शेती अनेक दृष्टींनी फायदेशीर असते. तिच्यामध्ये उपलब्ध साधनसामग्रीचा अधिक कार्यक्षमतेने आणि काटकसरीने उपयोग होऊ शकतो. जमिनीची उत्पादनक्षमता टिकविण्याच्या किंवा वाढविण्याच्या बाबतीतही तिची मदत होते. बहुविध पिकांच्या शेतीत काही पिकांत आलेले नुकसान दुसऱ्या पिकांत भरून निघत असल्याने काही प्रमाणात नुकसानभरपाई होते; मात्र एकेरी पिकांच्या शेतीत विशेषीकरणाचा जो फायदा मिळतो तो बहुविध पिकांच्या शेतीत मिळत नाही.
दुर्जल शेती
वार्षिक ५० सेंमी. किंवा त्यापेक्षा कमी अशा निश्चित पर्जन्यमानाच्या प्रदेशात दुर्जल शेती करतात. ओल टिकविणे आणि भूसंरक्षण या अशा प्रकारच्या शेतीतील महत्त्वाच्या समस्या होत. काही थोड्या पावसाळी महिन्यांत व त्यांच्या थोड्या मागील-पुढील काळात होणारी ही हंगामी शेती असते. पिकांची निवड मर्यादित असते. भूसंरक्षण करण्यासाठी आणि ओलावा टिकविण्यासाठी शेतीच्या मशागतीच्या काही खास शिफारस केलेल्या पद्धती वापरून ही पिके काढली जातात. उदा. समपातळीत बांध घालून त्यांना समांतर पिकांची पेरणी करणे, कमी बी पेरणे, रोपांची संख्या मर्यादित करणे, पट्टापेर पद्धतीने पीक पेरणे, आच्छादनाचा वापर करणे, खतांचा माफक वापर करणे इत्यादी.