चीनच्या सीमावर्ती गावांमध्ये लोक स्थायिक होण्यास सुरुवात

चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ वसवलेल्या गावांमध्ये लोकांना स्थायिक करण्यास सुरुवात केली आहे. यातून चीनचा भारताविरुद्धचा डाव यशस्वी होताना दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन नियंत्रण रेषेजवळ जवळपास 630 आदर्श गावे बांधत असून त्यापैकी जवळपास 500 गावांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या गावांना ‘जियाकॉन्ग व्हिलेज’ म्हणजेच ‘समृद्ध गावे’ असे नाव देण्यात आले आहे. पूर्व अरुणाचलच्या दुसऱ्या बाजूला चीनने अशी सुमारे 145 गावे बांधली आहेत. या गावांचे बांधकाम सहा वर्षांपूर्वी सुरू केले होते. चीन या गावांचा दुहेरी वापर करू शकतो, अशी भीती भारताने वारंवार व्यक्त केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावांचा एक उद्देश तिबेटींवर नजर ठेवणे हा आहे. तिबेटी लोक भारतीय लष्कराला माहिती देऊ शकतात, असा संशय चिनी लष्कराला आहे. गरज पडल्यास चीन या गावांचा लष्करी वापरही करू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. चीनने नियंत्रणरेषेच्या पलीकडे अनेक भूमिगत गोदामे बनवली आहेत. येथे चिनी बंकर देखील आहेत. ऑक्टोबर 2021 मध्ये, चीनने एक नवीन जमीन सीमा कायदा मंजूर केला असून तो 1 जानेवारी, 2022 पासून लागू झाला. या कायद्यानुसार चीन आपल्या सामान्य नागरिकांना सीमावर्ती भागात बसविण्याचे काम करत आहे. आता अनेक गावांमध्ये लोक दिसू लागले आहेत.

या गावांच्या माध्यमातून चीन भारतीय लष्कराच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकतो, आणि संभाव्य हल्ल्यांची तयारी मजबूत करू शकतो, अशी शक्यता आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *