भारताकडून म्यानमारला मदतीचा हात

म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपातील पीडितांना मदत करण्यासाठी भारताने सोमवारी ५० टन मदत साहित्याचा नवीन माल पाठवला. या भूकंपात म्यानमारमध्ये २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि ३,९०० जण जखमी झाले. भारतीय नौदलाच्या दोन जहाजे आयएनएस सातपुरा आणि आयएनएस सावित्री द्वारे म्यानमारच्या यांगून शहरात मदत साहित्य पोहोचवण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय नौदलाची आणखी तीन जहाजे – आयएनएस करमुख, आयएनएस घरियाल आणि एलसीयू-५२ – ५०० टनांहून अधिक अतिरिक्त मदत साहित्य घेऊन यंगूनला रवाना झाली आहेत.

म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपामुळे झालेल्या विध्वंसाला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी भारताने शुक्रवारी ऑपरेशन ब्रह्मा नावाची मदत मोहीम सुरू केली. शनिवारी, भारताने भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी पाच लष्करी विमानांमधून म्यानमारला मदत साहित्य, बचाव पथके आणि वैद्यकीय उपकरणे पाठवली. म्यानमारमधील भारतीय दूतावासानुसार, भारतीय हवाई दलाचे आणखी एक C-130 विमान मंगळवारी मंडाले येथे उतरण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये १५ टनांपेक्षा जास्त मदत साहित्य असेल.

गेल्या आठवड्यात म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या २००० हून अधिक झाली आहे. सरकारी माध्यमांनी सोमवारी ही माहिती दिली. बचाव कर्मचारी आणि मदत गटाने सांगितले की, भूकंपात पवित्र रमजान महिन्यात मशिदींमध्ये प्रार्थना करणाऱ्या शेकडो मुस्लिमांचा मृत्यू झाला आणि एक मठ कोसळल्याने २७० बौद्ध भिक्षूंचाही मृत्यू झाला. प्री-स्कूलचा वर्ग कोसळल्याने ५० मुलांचा मृत्यू झाला.

मदत गट आणि संयुक्त राष्ट्रांनी इशारा दिला आहे की भूकंपामुळे देशात दुष्काळ आणि आजार आणखी वाढू शकतात. शुक्रवारी म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे राजधानी नायपितॉ आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर मंडालेसह इतर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

 

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *