मुंबईत पाणी टँकर संपादरम्यान मोठा निर्णय

मुंबईतील टँकर संप संपत नसल्याने, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत बीएमसीने मोठे पाऊल उचलले आहे. बीएमसी आता शहरातील विहिरी, बोअरवेल आणि खाजगी पाण्याच्या टँकरचे नियंत्रण घेऊन स्वतः पाणीपुरवठा करेल. बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला. उन्हाळ्यात लोकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागू नये हा यामागचा उद्देश आहे.
सरकारने म्हटले आहे की, टँकर ऑपरेशन्सचे व्यवस्थापन बीएमसी वॉर्ड, मुंबई पोलिस आणि वाहतूक आयुक्तालयातील पथकांच्या समन्वित प्रयत्नांद्वारे केले जाईल. याशिवाय, खाजगी गृहनिर्माण संस्था आणि इतर भागधारकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी एक SOP तयार करण्यात आल्याचेही सरकारने सांगितले.
टँकरना पाणीपुरवठा करणाऱ्या खाजगी विहिरींच्या मालकांना नियमांचे पालन करण्याची खात्री करण्यासाठी बीएमसीने नोटीस बजावल्यानंतर मुंबई वॉटर टँकर्स असोसिएशनने (एमडब्ल्यूटीए) गुरुवारपासून अनिश्चित काळासाठी पाणीपुरवठा बंद केला. यामुळे निवासी सोसायट्या, रेल्वे आणि बांधकाम प्रकल्पांना पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. एमडब्ल्यूटीएकडे ५००-२०,००० लिटर क्षमतेचे सुमारे १,८०० नोंदणीकृत टँकर आहेत आणि हे टँकर मुंबईच्या विविध भागांना सुमारे ३५० एमएलडी पाणी पुरवतात.
अधिकाऱ्यांनी केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून एनओसी अनिवार्य केले आहे. एमडब्ल्यूटीएनुसार, विहिरीच्या भाडेपट्ट्याचा किंवा मालकीचा पुरावा, डिजिटल वॉटर फ्लो मीटर बसवणे, बीआयएस मानकांचे पालन करणे इत्यादी गोष्टी देखील अनिवार्य करण्यात आल्या आहेत.