
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत शाळांसाठी तयार केलेल्या नवीन पुस्तकांच्या हिंदी नावांवरील वादावर, एनसीईआरटी अर्थात भारतीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने स्पष्टीकरण दिले आहे.
त्यात म्हटले आहे की, पुस्तकांची नावे देशातील नवीन पिढीला भारतीय मुळांशी जोडतात, आणि ती राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारशींशी सुसंगत आहेत. या नावांना विरोध करणाऱ्यांचा विरोध पूर्णपणे अन्याय्य आहे. ही पुस्तके वाचणाऱ्यांना आणि ती शिकविणाऱ्यांना ती खूप आवडत आहेत.
पुस्तकांच्या हिंदी नावांवरील वादाच्या पार्श्वभूमीवर, एनसीईआरटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शाळांसाठी तयार केलेली ही पुस्तके दोन वर्षांपासून शिकवली जात आहेत परंतु तेव्हा कोणीही आक्षेप घेतला नाही. या पुस्तकांची नावे संतूर, मृदंग, तबला, वीणा इत्यादी भारतीय वाद्ये आणि रागांवरून ठेवण्यात आली आहेत. हे शब्द देशातील नवीन पिढीला भारतीय वाटतील.
एनसीईआरटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या दोन वर्षांत शिक्षक आणि मुलांकडून पुस्तकांसाठी मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. एनसीईआरटीच्या नवीन पुस्तकांना पहिल्यांदाच पाच स्टार रेटिंग मिळाले आहे. पूर्वी त्याचे रेटिंग फक्त दोन स्टार होते.