
काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी श्रीनगर पीसीआर रुग्णालयाला भेट दिल्यानंतर आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी सकाळी ११ वाजता काँग्रेस कार्यकारिणीची आपत्कालीन बैठक आयोजित केली जाईल. या हल्ल्यात निष्पाप जीव गेले. संपूर्ण वातावरण दुःखाने भरलेले होते, कुटुंबे विखुरली गेली होती, निष्पाप जीव उद्ध्वस्त झाले होते. आपण केवळ दुःखातच नव्हे तर हिंसाचार आणि दहशतवादाविरुद्धच्या आपल्या अढळ निर्धारातही एक असले पाहिजे, हे भारत कधीही विसरणार नाही.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विचारमंथन करण्यासाठी विरोधी पक्ष काँग्रेसने आज गुरुवारी पक्षाच्या कार्यकारिणीची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत, पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला गांभीर्याने तोंड देण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला जाईल. काँग्रेस जम्मू आणि काश्मीरमध्ये गुन्हेगारांविरुद्ध तसेच सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादावर कठोर कारवाईसाठी आवाज उठवेल, असे समजते. काँग्रेस कार्यकारिणीच्या या आपत्कालीन बैठकीत, हत्या झालेल्या निर्दोष नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाईल. त्यांच्या क्रूर हत्येचा तीव्र निषेध केला जाईल, आणि शोक प्रस्ताव मंजूर केला जाईल.