
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत भारताने १९६० मध्ये पाकिस्तानसोबत केलेला सिंधू पाणी करार थांबविण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाविरुद्ध ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत हा करार स्थगित राहील, असे भारताने म्हटले आहे. भूतकाळात दोन्ही देशांमधील युद्धाच्या परिस्थितीतही भारताने सिंधू पाणी करार रद्द केला नव्हता.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्र सरकार गुरुवारी सर्वपक्षीय बैठक घेत आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील, अशी शक्यता आहे. काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी सरकारने या मुद्द्यावर सर्व पक्षांची बैठक बोलवावी, अशी मागणी केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह या मुद्द्यावर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. सिंग विविध पक्षांच्या नेत्यांना या दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण माहिती देतील अशी शक्यता आहे. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांचा हवाला देऊन हे वृत्त दिले आहे. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले कानपूरचे शुभम द्विवेदी आणि नेपाळचे सुदीप यांचे पार्थिव लखनऊ विमानतळावर आणण्यात आले. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.