कामगार कल्याण मंडळ बैठकीत योजनांचा आढावा

प्रभादेवी – मुंबई येथील कामगार व क्रीडा भवन येथे कामगार कल्याण मंडळाची आढावा बैठक झाली. मंडळाच्या सर्व योजनांचे सामाजिक मूल्यांकन करावे. या योजनांचा आतापर्यंत किती कामगारांना लाभ झाला याची माहिती सादर करावी. कामगारांमध्ये मंडळाच्या योजनांची माहिती व्हावी, यासाठी जनजागृती करावी. त्यासाठी समाजमाध्यमातून याचा प्रसार करावा, अशा सूचना कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिल्या.
कामगार कल्याण मंडळाने कामगारांच्या गरजेनुसार परिपूर्ण योजना तयार करून त्याचा प्रस्ताव शासनास सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीस कामगार आयुक्त रविराज इळवे, कामगार विभागाच्या उपसचिव रोशनी पाटील – कदम यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले की, “अपघाती मृत्यू, दुर्धर आजार, कामगारांच्या मुलांचे शिक्षण व सामाजिक सुरक्षा या बाबींवर लक्ष केंद्रीत करावे. कामगारांच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकास केंद्र, कला आणि क्रीडा प्रशिक्षण केंद्र अशा सुविधा उभारण्यात याव्यात.”