मच्छीमार बांधवांना सावधगिरीचे आवाहन

महाराष्ट्र आणि गोव्याजवळ असलेल्या अरबी समुद्रावर 21 मे रोजी एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज आहे. त्याच्या प्रभावामुळे 21 ते 24 मे दरम्यान अरबी समुद्र काही प्रमाणात खवळलेला असू शकतो. पश्चिम किनारपट्टीवर 22 ते 24 दरम्यान पावसासह वाऱ्याचा वेग काही प्रमाणात वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मच्छीमार बांधवांनी हवामानाच्या स्थितीकडे लक्ष ठेवावे. स्वतःच्या सुरक्षितेसाठी 21 ते 24 मे दरम्यान अरबी समुद्रातील खोल भागांमध्ये जाणे टाळावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.
21 आणि 22 मे रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या जवळ असलेला समुद्र काही प्रमाणात खवळलेला असू शकतो. 22 ते 24 दरम्यान रत्नागिरी, मुंबई, आणि पालघर जवळ असलेला समुद्र काही प्रमाणात खवळलेला असू शकतो.