मुंबई, कोकणसह राज्यभरात जोरदार पावसाची हजेरी

राज्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तीव्र तडाखा असतानाच अखेर मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आजपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासूनच ढगाळ हवामान असून, काही भागांत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना याचा विशेष फटका बसण्याची शक्यता असून, संबंधित जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईत सकाळपासूनच पावसाने रस्ता तुंबवायला सुरुवात केली असून, काही मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याचेही वृत्त आहे. लोकल ट्रेन सेवांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी सध्या सेवा सुरळीत सुरु असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पावसामुळे दिलासा, पण काळजीही आवश्यक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला, तरी अतिवृष्टीमुळे दरड कोसळणे, विद्युत अपघात, पाणी साचणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान विभागानुसार पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये हलक्यापासून ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज आहे.