Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

चांगदेवाची समाधी असलेले पुणतांबा

अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगांव तालुक्यातील ‘पुणतांबा’ गावाला धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक परंपरा आहे. हे गाव गोदावरीच्या तीरी वसले आहे. पुणतांब्याचा उल्लेख महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धार्मिक क्षेत्रांत होतो.

त्या गावाचे नाव ‘पुण्यस्तंभ’ अथवा ‘नगर’ असे होते. ती राजा विक्रमादित्याची राजधानी. पुणतांबा गावाला पूर्ण तटबंदी असून गावाला अकरा वेशी आहेत. बऱ्याच ठिकाणी तटबंदी ढासळली आहे. विक्रमादित्य राजाने त्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण कालखंड पुणतांबा येथे व्यतीत केला. महायोगी चांगदेव महाराजांची समाधी तेथे आहे. चांगदेवाना त्यांच्या विद्वत्तेचा व तपसामर्थ्याचा गर्व झाल्याने ते ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीस गेले व तेथे गर्वहरण होऊन परतले. ती कथा प्रसिद्ध आहे. चांगदेव महाराजांनी ज्ञानदेवांची धाकटी बहीण मुक्ताईला गुरू केले. त्यांनी चौदाशे वर्षें घोर तपश्चर्या केल्यानंतर माघ वद्य ३ शके १२९८ रोजी पुणतांबा येथे समाधी घेतली.

वैदिक काळात पुणतांबा येथे गोदावरीकाठी ऋषिमुनी तपश्चर्या करीत. पुरातनकाळी हे गाव धार्मिक विधी करण्यासाठी विख्यात होते. गावात बहुतांश वस्ती ब्राह्मणांची होती. गावातील बहुतांश वाडे ब्राह्मणांचेच आहेत. पुण्यप्राप्ती व मोक्षप्राप्ती यासाठी काशीनंतर पुणतांबा हे एकमेव महत्त्वपूर्ण ठिकाण मानले जाई. पुणतांबा येथे गोदावरी दक्षिण दिशेने वळते. अंत्यविधीनंतरचे धार्मिक कार्यक्रम तेथे मोठ्या प्रमाणावर होतात. महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींचेही पुणतांबा गावी काही काळ वास्तव्य होते. स्वामींच्या अनुयायांनी गोदाकाठी चक्रधरस्वामींचे भव्य मंदिर बांधले आहे. साईबाबांनीही पुणतांबा गावी बराच काळ वास्तव्य केले. पुणतांब्याचे धार्मिक महत्त्व ओळखून दोनशे वर्षांपूर्वी सद्गुरू गंगागीर महाराज आषाढी एकादशी व महाशिवरात्र या दोन दिवशी पुणतांबा येथे जात. तेथूनच त्यांच्या नामसप्ताहाचा आरंभ झाला. पुणतांबा येथूनच नामसप्ताहाचे आयोजन करणाऱ्या गावाचे नाव जाहीर करण्याची व त्यांना रीतसर नारळ देण्याची परंपरा सुरू आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांनी पुणतांबे गावी अनेक वर्षें वास्तव्य केले. तेथील काशीविश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धारही केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनीही तेथे धार्मिक विधी व्यवस्थितपणे पार पाडता यावेत, यासाठी गोदावरीला घाट बांधला. तो घाट सुस्थितीत आहे. अहिल्यादेवींनी बांधलेला वाडा मात्र पडक्या अवस्थेत आहे. तेथे महाशिवरात्र व आषाढी एकादशी यादिवशी यात्रा भरते. तीर्थस्थानाचा शासकीय विकासयोजनेत समावेश करण्यात आला आहे. शिर्डी-पुणतांबा रेल्वेमार्ग उपलब्ध झाल्याने पुणतांबा या धार्मिक स्थळाचे नावही शिर्डीप्रमाणे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नकाशात गेले आहे.

चांगदेव महाराजांनी ज्यांना गुरू केले त्या मुक्ताईचे मंदिर चांगदेव महाराज समाधीजवळ असावे, या धारणेतून महंत रामानंदगिरी यांनी दोन वर्षांपूर्वी मुक्ताई मंदिर उभारणीचे काम हाती घेतले होते, ते पूर्ण झाले आहे. तसेच, आध्यात्मिक शिक्षण देण्यासाठी मुक्ताई मठाची स्थापना करण्यात आली आहे.

पुणतांबे गावी पुरातनकालीन कार्तिकेय मंदिर आहे. त्या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेला ‘कृतिका महोत्सव’ साजरा केला जातो. मंदिरासमोर त्रिपूर पेटवून प्रवाहीत केले जातात. कार्तिकी पौर्णिमेला मंदिरात जप-तप साधना केल्यास साधकाला फलप्राप्ती होते. त्यादिवशी मध्यरात्री नदीचे पाणी दुधासारखे पांढरे स्वच्छ होते, व कार्तिकेय स्वामी त्यावेळी नदीत स्नानासाठी येतात, अशी आख्यायिका आहे. मंदिरात स्त्रियांना प्रवेश वर्ज्य आहे; मात्र त्रिपुरारी पौर्णिमा व कृतिका नक्षत्रांवर महिलांना मंदिरात प्रवेश मिळतो. कार्तिकेय स्वामींचे दर्शन घेता येते. कार्तिकस्वामींना नारळ, मोरपीस, रूद्राक्ष, सोने, पिवळे जानवे, तीळ, मूग वाहून प्रसन्न केले जाते. मंदिरात होणाऱ्या कृतिका महोत्सवास लाखो भाविक कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतात.कार्तिक स्वामी मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *