शेतकरीपुत्रांकडून वडिलांचा अनोखा सन्मान
महाराष्ट्रातील सर्व शेतकरीपुत्रांना अभिमान वाटावा असा आपले वडील किसन दुधाने यांचा पूर्णाकृती पुतळा सातारा जिल्ह्यातील ‘खिंगर’ गावातील दुधाने भावंडांकडून उभारण्यात आला आहे.आपल्या वडिलांविषयीची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे.
आम्ही घरातून बाहेर पडताना आणि घरात परत येताना आमचे वडील आम्हाला दिसले पाहिजेत, कारण आमचे वडील आमच्यासाठी प्रेरणाशक्ती, ऊर्जा शक्ती होते. त्यांची आठवण आम्हा सर्वांच्या कायम स्मरणात रहावी यासाठी आम्ही पुतळा उभारला आहे. आमचे वडील आमच्या घरात आसपासच आहेत, अशी आम्हाला जाणीव राहील हा मुख्य उद्देश ठेवून या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी केल्याचे ‘खिंगर’ येथील शेतकरीपुत्र अनिल दुधाने, संजय दुधाने, धनंजय दुधाने या तिघा भावंडांनी सांगितले.
जीवनभर कष्ट करून आपल्या मुळाबाळांना मोठे केले, समाजासाठी झटले, दुर्गम भागात शेतीत काबाडकष्ट केले. सामाजिक, राजकीय, कृषीच्या माध्यमातून त्यांनी गावाच्या विकासासाठी नेहमीच पुढचे पाऊल ठेवले. किसन दुधाने यांनी आपल्या शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करून येथील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कसे स्वावलंबी करता येईल यासाठी नेहमीच इतरांना मार्गदर्शन केले. गावाचा विकास असो, तंटा असो किंवा शेतीतील अडचणी असो, कृषीरत्न किसन दुधाने हे नेहमीच ‘भाऊ’ म्हणून सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असायचे.कृषीक्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी आपली ओळख जगाला पटवून दिली. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणीजवळील ‘खिंगर’ सारख्या दुर्गम भागात बिकट परिस्थितीतही सोन्यासारखी शेती फुलवली आणि महाराष्ट्रातील दगडधोंडे बोलते केले, ते कृषिरत्न किसन दुधाने यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली होती. आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याने ती पोकळी भरून काढली आहे.
त्यांच्या कार्याचा आदर्श वारसा महाराष्ट्रातील शेतकरीपुत्रांनी घ्यावा, त्यांचे महान कार्य तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील लोकांच्या लक्षात रहावे हा त्या पाठीमागील दृष्टीकोन आहे, असे संजय दुधाने सांगतात.
शेतकरीपुत्र कसा असावा याचेही उत्तम उदाहरण सांगणारे हे स्मारक आहे.
स्ट्रॉबेरी पिकावर केलेल्या संशोधनाबाबत महाराष्ट्र शासन, विविध संस्थांनी किसन दुधाने यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित केले होते.