
मुंबई-पुणे महामार्गावर समुद्रसपाटीपासून ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील लोणावळा हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रीने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या, पावसाळ्यात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारे काही मनाला खूप सुखद वाटते. म्हणूनच याठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.
पावसाळ्याच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळ्यात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळ्यात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते.
लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स ॲन्ड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर किल्ले ही त्यांपैकी काही महत्वाची ठिकाणे आहेत.

लोणावळा येथील शुद्ध देशी ‘गीर’ गायीच्या दुधापासुन बनविलेली साजुक तुप आणि मधात घोळलेली चिक्की तर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे. येथून रोज ५००० टन चिक्की निर्यात केली जाते.
लोणावळा हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे. लोणावळा पुण्यापासून रस्त्याने ६४ किमी तसेच मुंबईपासून ९६ किमी अंतरावर आहे. ‘लोणावळा चिक्की’ हा एक चवीने आंबट गोड असलेला सुप्रसिद्ध पदार्थ आहे. लोणावळा हे मुंबई व पुण्यामधील एक अतिमहत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. पुण्यातून येथे येण्यासाठी उपनगरीय लोकल रेल्वेगाड्या असतात. मुंबई-पुणे महामार्ग आणि मुंबई-चेन्नई महामार्ग लोणावळा शहरातून जातो. खंडाळा हे एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. येथून मुंबई दिशेला जाणाऱ्या बोरघाटाची उतरण सुरू होते.
लोणावळ्यापासून ६.५ किमी अंतरावर ‘राजमाची पॉईंट’आहे. येथून शिवाजी महाराजांचा राजमाची किल्ला तसेच आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य बघता येते. ‘टायगर पॉईंट’ हा एक उंचावरील कडा आहे. जेथे सरळ उभी अशी ६५० मीटरची खोल दरी आहे. लोणावळ्याजवळच्या ‘मळवली’ येथे असलेल्या ‘कार्ला’ लेण्यांची निर्मिती बुद्ध भिक्षूंनी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकात केली. येथे एकवीरा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.
‘मळवली’ रेल्वे स्थानकापासून ११.२ किमी लांबीच्या चढाईच्या रस्त्याने, एके काळी शिवाजी महाराजांचा लष्करी तळ असलेल्या ‘लोहगड’ किल्ल्यावर पोहोचता येते. ‘लोहगडा’समोरच ‘विसापूर’ चा किल्ला आहे.
येथील ‘भुशी’ धरण प्रसिद्ध आहे. लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र ‘आयएनएस शिवाजी’चे मुख्यालय आहे.