द्रोण-पत्रावळीचा व्यवसाय
लग्नसोहळा, कौटुंबिक समारंभ, मंदिरातील प्रसाद-महाप्रसादासाठी द्रोण पत्रावळींचा वापर केला जातो. अलीकडे, पानांपासून तयार केलेले द्रोण आणि पत्रावळी जास्त वापरात दिसत नाहीत. मध्यंतरीच्या काळात प्लास्टिक आणि थर्माकोलचे द्रोण-पत्रावळी वापरात येऊ लागल्या. शासनाने त्याच्या वापरावर बंदी आणली. त्यामुळे कागदापासून बनविलेले द्रोण आणि पत्रावळी यांचा वापर आता वाढला आहे. हे वजनाने हलके असल्याने सहल किंवा प्रवासामध्ये वापरण्यास अगदी सोयीस्कर वाटते.
आजकाल आपणांस खाऊ गल्लीतील छोट्या टपरीवरसुद्धा कागदी प्लेट देतात. सांगायचे काय तर याचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे या व्यवसायात संधी आहे.

कागदी द्रोण व पत्रावळी आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या आकारात मिळून जातात.
हा व्यवसाय अल्प गुंतवणुकीत अगदी सहज सुरू करता येऊ शकतो. त्याआधी बाजारात असलेली याची मागणी, व्यवसाय सुरू करण्यास लागणारे एकूण भांडवल आणि परवाने याबद्दलची पूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. सर्वात आधी आपण जिथे उत्पादन विकणार आहोत, ते बाजार निवडावे लागतील. लोकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन प्लेट बनवाव्या लागतील. सोबतच गुणवत्तेकडे पण खास लक्ष द्यावे लागेल.
आपल्या आसपासच्या छोट्या-मोठ्या दुकानात, हॉटेल्समध्ये आणि फूड स्टॉलवर जाऊन त्यांच्याशी चर्चा करून आपला व्यवसाय आणि उत्पादनाबद्दल सांगू शकता. याने आपल्या विक्रीत वाढ होईल.
व्यवसाय करताना आपले लक्ष नफ्यावर असले पाहिजे; पण याचा अर्थ असा नाही की आपण उत्पादनाच्या गुणवत्तेवर तडजोड करावी. आपण जो कच्चा माल वापराल त्याच्या गुणवत्तेवर पूर्ण लक्ष दिले तर साहजिकच आपले उत्पादन पण उत्कृष्ट दर्जाचे बनणार आहे. आपला व्यवसाय कितीही छोटा असला तरी त्याची नोंदणी करणे आवश्यक असते. यामुळे पुढे कोणतीही अडचण येत नाही.

आपल्या व्यवसायाची नावाने नोंदणी करून घ्या. याने व्यवसाय वाढीसाठी खूप मदत होते. त्यासोबत पुढे व्यवसाय वाढविण्यासाठी आवश्यकता भासल्यास कोणत्याही बँकेकडून त्वरित कर्ज देखील उपलब्ध होईल. म्हणून व्यवसायाची नोंदणी आवश्यक आहे. या व्यवसायातील जास्तीत जास्त काम हे यंत्रावर अवलंबून आहे. भारतात कुठेही यंत्रे मिळून जातात. आता नक्की कोणती यंत्रे घ्यायची हे आपल्या उपलब्ध भांडवलावर अवलंबून आहे. आपण अगदी छोट्या आणि कमी उत्पादन करणार्या यंत्रापासून सुरुवात करून आधी या व्यवसायाचा अनुभव घेऊ शकता. मग हळूहळू भांडवल वाढवून मोठ्या क्षमतेची यंत्रे घेऊन व्यवसाय वाढवू शकता.
अर्ध स्वयंचलित यंत्रे दहा हजार ते तीस हजारच्या दरम्यान मिळून जातात. संपूर्ण स्वयंचलित यंत्रामध्ये ‘सिंगल डाय’ आणि ‘डबल डाय’ अशा दोन प्रकारची यंत्रे उपलब्ध असतात. ‘सिंगल डाय’ ची किंमत ४० हजार पासून तर ‘डबल डाय’ची किंमत ७० हजार पासून सुरू होते. या व्यवसायाला सुरूवात करण्यास लागणारे एकूण भांडवल हे आपण घेतलेल्या यंत्रावर अवलंबून आहे. जर आपण अर्ध स्वयंचलित यंत्र घेतले तर तीस-चाळीस हजारमध्ये व्यवसाय सुरू करता येईल.
पत्रावळी बनविण्यासाठी सर्वात आधी कच्च्या कागदाला प्लेटच्या आकारात कापावे लागते. संपूर्ण स्वयंचलित यंत्रामध्ये हे काम डायद्वारे केले जाते. ‘डाय’ मध्ये बदल करून पत्रावळीला वेगवेगळे आकार देऊ शकता.
यानंतर तुम्ही बनवलेल्या पत्रावळींची आकार आणि संख्येनुसार विभागणी करून आकर्षक वेष्टनबंद करावे.
व्यवसायात यशस्वी होण्याकरीता आणखी एक महत्वाची गोष्ट आवश्यक असते, ती म्हणजे वस्तूची विक्री. आपण बनविलेल्या वस्तूंचा खप वाढवता आला पाहिजे. यानेच व्यवसायात वाढ होते. व्यावसायिकांना भेटून त्यांच्यापर्यंत आपल्या उत्पादनाची माहिती पोहोचविली पाहिजे.