राज्यात महा कृषीविकास अभियान
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्यात ‘महा कृषीविकास अभियान’ राबविण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे.

या अभियानाअंतर्गत राज्यातील शेतमालाचे उत्पादन व मूल्यवर्धनासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट आणि समुहासाठी योजना राबविण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात एकात्मिक प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार असून शेतमालाची मूल्यवर्धन साखळी उभारण्यासाठी अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून ५ वर्षात ३ हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची घोषणा फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे.

राज्यात शेतमालाच्या मूल्यवर्धन साखळीच्या अभावामुळे शेतीमालाचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागते. त्यासाठी राज्यात शेतमालाची विविध मूल्यवर्धित साखळी उभारण्यासाठी राज्य सरकारने तरतूद केली आहे.
दरम्यान, शेती क्षेत्रात अधिक गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असल्याचेही फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. त्याचाच भाग म्हणून या ‘महाकृषी विकास अभियाना’ ची घोषणा करण्यात आली आहे.