
‘इगतपुरी’ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या तालुक्याचे गाव आहे. येथे ‘महिंद्रा आणि महिंद्रा’ कंपनीचा यंत्रे बनविण्याचा कारखाना आहे. तसेच ध्यानाचे शिक्षण देणारे ‘विपश्यना केंद्र’ येथे आहे. हे मुंबई-आग्रा महामार्गावरील गाव आहे. ‘इगतपुरी’ आणि ‘खंडाळा’ या दोहोंची उंची साधारण सारखीच म्हणजे जवळपास १९०० फुट आहे. ‘इगतपुरी’ हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध झाले आहे. या परिसरातील धबधबे पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. भात हे येथील प्रमुख पिक आहे. याशिवाय परिसरात नागली तसेच भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. कडधान्य पिकेदेखील घेतली जातात. टोमॅटो, काकडी, दोडका, कारले, वांगी, सिमला मिरची, इत्यादी पिके पिकवली जातात.

‘इगतपुरी’ त मुक्काम करून आजूबाजूला पाहण्यासारख्या जागा म्हणजे अप्पर वैतरणा धरण, भंडारदरा धरण, सुंदर नारायण गणेश मंदिर-देवबांध, याशिवाय कुलंग, अलंग, मदनगड, कळसूबाई, रतनगड या उत्तुंग डोंगररांगा तसेच सांधन दरी, रंधा धबधबा या ठिकाणापासून जवळच आहे. ‘कसारा’ घाटाजवळ भातसा दरी, उंट दरी, पाच धबधबे अशी सुंदर ठिकाणे आहेत. ‘कसारा’ घाटातील धुके अनुभवणे हा एक रोमांचकारी अनुभव असतो. तसेच ‘इगतपुरी’ गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी ‘धम्मगिरी’ हे विपश्यना केंद्र आहे .बौद्ध धर्मातील ‘विपश्यना’ या ध्यानाच्या एका प्रकाराची साधना करण्यासाठी देशातील निरनिराळ्या भागातून, तसेच परदेशांतूनही अनेक लोक येथे येतात. इगतपुरीहुन साधारण ४०-५० किमी अंतरावरील ‘भंडारदरा’ धरण हे उत्तम ठिकाण आहे. ‘घोटी’ या गावाजवळून ‘कावनई’, ‘त्रिंगलवाडी’ हे एका दिवसात पाहण्यासारखे किल्लेही आहेत. ‘घोटी’ हे तांदूळ, मुरमुरे व भाजीपाला मिळण्याचे प्रसिद्ध ठिकाण आहे.
‘इगतपुरी’ जवळच ‘धनुष्यतीर्थ’ धबधबा पाहण्यासारखा आहे.