कांद्यासाठी शेतकरी विधानभवनाच्या दिशेने
कांद्याला किमान ६०० रुपये अनुदान आणि उन्हाळी कांद्याला २ हजार रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव द्यावा, अशी मागणी किसान सभेने केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याची घोषणा विधिमंडळात केली; परंतू हे अनुदान पुरेसे नाही, अशी भूमिका किसान सभेने घेतली आहे.

किसान सभेने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढत असून शनिवारी रोजी विधीमंडळावर हा मोर्चा धडकणार आहे. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले आहेत.
“कांद्याला प्रतिक्विंटल ३०० रुपये अगदीच कमी अनुदान आहे, किमान ६०० रुपये अनुदान सरकारने द्यावे,अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा विकला आहे. केवळ १० ते २० टक्के कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट करावे की, अनुदान कांदा विकलेल्या शेतकऱ्यांदेखील मिळणार आहे की नाही? अन्यथा सरकारच्या या घोषणेची केवळ १० ते २० टक्के कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत होईल. शेतकरी सरकारच्या घोषणेवर समाधानी नाहीत,” अशी भूमिका किसान सभेचे नेते अजित नवले यांनी मांडली आहे.

उन्हाळी कांद्याला सरकारने २ हजार रुपये हमीभाव द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी अनुदान ६०० रुपये प्रतिक्विंटल करावे, अशी मागणी मोर्चामध्ये सहभागी शेतकऱ्यांनी केली.
दरम्यान, नाशिकमध्ये मोर्चात सहभागी शेतकऱ्यांशी दादा भुसे यांनी चर्चा केली. परंतु या चर्चेतून कुठलाही मार्ग निघाला नाही. हजारो शेतकऱ्यांचा सहभाग असलेला हा मोची २० मार्च रोजी विधीमंडळावर धडकणार आहे.