विविधरंगी ढोबळी मिरची
महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्यामध्ये हिवाळी हंगामात ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. ढोबळी मिरची वेगवेगळ्या रंगांमध्ये मिळत असल्याने तिचा भाजीशिवाय इतरही उपयोग होतो. ढोबळी मिरचीच्या चवीमधील फरक हा मुख्यत्वे करून फळामधील ‘कॅपीसीन’च्या प्रमाणावर अवलंबून असतो.

ढोबळी मिरचीला दिवसाचे सरासरी तापमान 25 अंश सेल्सिअस व रात्रीचे 14 अंश सेल्सिअस उत्तम असून तापमान 10 सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास या पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. ढोबळी मिरचीची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात. त्यामुळे फळांची काढणी जानेवारी, फेब्रुवारी या कालावधीत करता येते. ढोबळी मिरचीला जमीन चांगली कसदार व सुपीक लागते. मध्यम ते भारी, काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य आहे. नदीकाठच्या पोयट्याच्या सुपीक जमिनी लागवडीसाठी योग्य आहेत. जमिनीचा सामु 6 ते 7 च्या दरम्यान असावा लागतो. ढोबळी मिरचीची लागवड रोपे लावून करतात. यासाठी रोपवाटीका करतात. जमीन चांगली उभी-आडवी नांगरून हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत घालतात. पूर्वीच्या पिकांची धसकटे गोळा करून दोन कुळवाच्या पाळ्या देतात. ‘कॅलिफोर्निया वंडरअर्का’, ‘मोहिनीयलो वंडर’, ‘इंद्रा’ या ढोबळी मिरचीच्या जाती आहेत.

रोपे तयार करण्यासाठी निवडलेली रोपवाटीकेची जागा चांगली नांगरून तयार करावी लागते. त्यानंतर गादी वाफे तयार करून वाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत घालावे लागते. वाफ्यांच्या रूंदीला समांतर अशा 2 सेमी. खोलीच्या रेघा ओढून त्यांत ‘फोरेट 10 जी’ हे किटकनाशक 10 ग्रॅम प्रत्येक वाक्यात टाकून बी पेरावे लागते. ते मातीने झाकून ठेवतात. बियाण्यांची चांगली उगवण व्हावी म्हणून वाफ्यांना झारीने हलकेसे पाणी दिले जाते. हे बी 6 ते 8 आठवड्यांनी लागवडीस तयार होते. ढोबळी मिरचीला लागवडीपासून सुरुवातीच्या वाढीसाठी भरपूर व नियमित पाण्याची आवश्यकता असते. फुले व फळे लागताना नियमित पाणी द्यावे. सर्वसाधारपणे एक आठवड्याच्या अंतराने पाणी द्यावे लागते. ‘मर’, ‘बोकड्या’ या रोगांना हे पिक बळी पडते.
फळे हिरवीगार असताना फळांची काढणी करावी. त्यासाठी फळांच्या टोकांच्या वाळलेल्या स्त्री केसरांचा भाग गळून पडलेला असावा. फळे झाडावर जास्त काळ ठेवल्यास ती पिकतात. काही देशात लाल फळांना जास्त मागणी असते; परंतु यामुळे पुढील फळांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो व उत्पादन कमी मिळते. फळे झाडावरून देठासहीत काढावीत. साधारणपणे दर 8 दिवसांनी फळांची काढणी करावी. अशा 4 ते 5 काढणीत सर्व पिक निघते. प्रति हेक्टरी ढोबळी मिरचीचे 17 ते 20 टनापर्यंत सरासरी उत्पादन मिळते.