मुरमुरे प्रकिया उद्योग
मुरमुरेंची निर्मिती तांदळापासून केली जाते. राज्यातील काही भागात त्यास ‘चुरमूरे’ असेही म्हणतात. भेळ, भडंग, लाडू, चिवडा इ. खाद्यपदार्थ तयार करणेसाठी मुरमुरेंचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. शिवाय मंदिरामध्ये प्रसाद तयार करण्यासाठी अथवा तुळशी विवाहासारख्या कार्यक्रमात प्रसाद म्हणून भाविकांना वाटण्यासाठी ‘मुरमुरे’ वापरले जातात. आज लोकांच्या जीवनशैलीत मुरमुरे खाण्याचेही प्रमाण वाढत आहे. फार पूर्वी ग्रामीण भागात घरगुती पातळीवर मुरमुरे करीत होते. शेजारपाजारचे शेतकरीही अशा व्यक्तींकडून तांदूळ देऊन मुरमुरे तयार करून घेत. आज चित्र बदलले आहे. धावपळीच्या या आधुनिक युगात भात चक्कीवर नेऊन मुरमुरे तयार करून घेण्याइतपत वेळ नाही; परिणामी सर्वत्र तयार मुरमुरे विकत घेणेच पसंत केले जात आहे.

शहरी भागात तर वेळेअभावी मुरमुरे आणि त्यापासून बनविले जाणारे इतर पदार्थही विकत घेण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. झपाट्याने वाढत चाललेली आजची लोकसंख्या आणि बदलती खाद्यसंस्कृती विचारात घेता तसेच वरील परिस्थितीचा विचार करता मुरमुरे निर्मिती आणि विक्री उद्योगास भरपूर वाव असल्याचे दिसते. भातापासून मुरमुरे तयार करणे हा एक तांत्रिक उद्योग असल्याने आज फक्त हे तंत्र माहिती असणारे लोकच हा व्यवसाय करतात.
मुरमुरे कसे बनवितात?
मुरमुरे निर्मितीच्या प्रामुख्याने २ पद्धती आहे एक म्हणजे ‘पारंपरिक पद्धत’ व दुसरी आहे ती ‘प्रगत पद्धत’ . घरच्या घरी मुरमुरे बनविण्याच्या पद्धतीत भात (टरफलासहित असलेले तांदूळ) गरम पाण्यात २४ तास भिजवितात. नंतर पाणी काढून ते भात कढयांमधून वाळूबरोबर भाजतात. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या ‘भट्टया’ व ‘कढया’ वापरतात. यामधून कोरडा उकडा भात मिळतो. हा भात नंतर सुर्याच्या उष्णतेने वाळविला जातो. वाळविलेला भात नंतर ‘हलर’ गिरणीतून भरडला जातो. या प्रक्रियेत कोंडा, तुस व तांदूळ मिळतो. ‘तुस’ याच भट्ट्यांसाठी इंधन म्हणून वापरतात. तांदळाचा ओलावा कमी करण्यासाठी तो कढईद्वारे तापविला जातो. हा तांदूळ नंतर मिठाच्या द्रावणाबरोबर मिसळविला जातो. मिठाच्या द्रावणासह असणारा तांदूळ पुन्हा एकदा भट्टीवर कढईतून जास्त प्रमाणाच्या आचेवर काही सेकंद भाजला जातो. याचवेळी त्यापासून मुरमुरे तयार होतात.
प्रगत पद्धतीमध्ये पारंपरिक पद्धतीत थोडाफार बदल करून मुरमुरे बनवितात. यामध्ये प्रामुख्याने दोन-तीन बाबींचा विचार केला आहे. एक म्हणजे उकडा भात की ज्यामध्ये तांदूळ फुगीर व लांबट होतो ; आणि दुसरे म्हणजे मुरमुरे बनविण्याच्या प्रक्रियेत एकसंधता आणणे. तिसरी अत्यंत महत्वाची बाब म्हणजे जुन्या पद्धतीत वापरण्यात येणा-या कढया व भट्ट्यांऐवजी यंत्राद्वारे मुरमुरे तयार करतात. उकडा भात बनविण्याच्या पद्धतीपैकी (वाफेद्वारे, कोरडी गरम हवा व दाबाद्वारे) ‘कोरडी गरम हवा’ या पद्धतीद्वारे केले जाणारे उकडीकरण मुरमुरे बनविण्याच्या प्रक्रियेत अत्यंत चांगले असल्याचे सिद्ध झाले आहे. जितके उकडीकरण चांगले तितके मुरमुरे चांगले, असे म्हणतात.

मुरमुरे बनविण्याच्या आधुनिक पद्धतीमध्ये प्रथम भात स्वच्छ धुतात; किंवा ‘बायसल्फाईट’ द्रावणात टाकून धुतात. यानंतर हा भात (साळ) एका भांड्यात घेवून त्यावर २ ते २.५ किलो प्रति चौरस सें.मी. दाब या प्रमाणात वाफ सोडून १५ मिनिटानंतर हा भात वाळवणी यंत्राद्वारे अथवा उन्हात वाळवला जातो. १२ ते १३ टक्के ओलाव्याला आल्यानंतर ‘हलर’ गिरणीतून भरडला जातो. या प्रक्रियेत आपणास उकडा भात मिळतो. मुरमुरे बनविण्याच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त लांबट व फुगीर बनतो. असा भात साधारणपणे मुळ भातापेक्षा १० ते १२ टक्के लांबतो. नंतर हा तांदूळ जून्या पद्धतीप्रमाणेच प्रक्रिया करून मुरमुरे बनविण्यासाठी वापरला जातो.
मुरमुरे तयार करण्यासाठी घेतलेल्या ‘हलर’ यंत्राचा वापर घरघंटी म्हणुन आटा चक्कीसाठी सुद्धा करू शकतो. या उद्योगासाठी अन्न व औषध प्रशासनाचा परवाना आवश्यक आहे. उद्योगासाठी शुद्ध पाण्याची उपलब्धता गरजेची आहे. मुरमुरे प्रक्रियेत तयार होणारे भुस / कोंडा विक्री करून जास्तीचे उत्पादन मिळते. साधारणतः १ क्विंटल प्रतिदिन मुरमुरे उत्पादन करण्याची क्षमता असलेले मुरमुरे यूनीट सुरू करण्यासाठी १ कुशल कारागीर, १ मदतनीस, १ विक्रेता अशी एकूण ३ कामगारांची आवश्यकता असते. साधारणतः वर्षातील ३०० दिवस हा उद्योग चालेल, असे अपेक्षित असल्याने मनुष्यबळाची उपलब्धता ही कायमस्वरूपी राहील, याची काळजी घ्यावी लागेल.
मुरमुरे निर्मितीसाठी कच्चा माल खरेदी करताना खालील बाबी ध्यानात ठेवाव्यात.
चांगली पोसलेली व स्वच्छ साळ (भात) निवडावी.
काढणीनंतर साळीची हाताळणी योग्य पद्धतीने केलेली असावी.
साळीवर जास्त प्रमाणात रसायनांचा वापर केलेला नसावा.
साळ योग्य पद्धतीने वेष्टनबंद होऊन त्याची वाहतुकीदरम्यान जास्त हेळसांड झालेली नसावी.
साळ चांगली वाळलेली असावी; शिवाय ती चांगल्या पद्धतीने साठविलेली असावी.
साळीची खरेदी साधारणतः मालाची आवक जास्त असताना करावी; जेणेकरून कमी किंमतीत उत्तम प्रतीची साळ मिळेल.
उद्योगासाठी जागेची निवड करताना त्याठिकाणी वाहतूक, पाणी, वीज इ.ची उपलब्धता असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. याचबरोबर जागेची निवड जेथे कच्चा माल सहज आणि मोठ्या प्रमाणात होईल, शिल्लक राहणाऱ्या टाकावू मालाची विल्हेवाट लावणे शक्य होईल, अशा ठिकाणी करावी. यामुळे उत्पादन निर्मिती सातत्याने चालू राहू शकेल आणि टाकावू मालामुळे इतरांना त्रासही होणार नाही. ही जागा रस्त्यालगत मोक्याच्या ठिकाणी असली पाहिजे; जेणेकरून उत्पादित मालाची ने- आण करण्याच्या दृष्टीने सुलभता येईल. प्रक्रिया उद्योगाच्या जागेवर पाण्याची मुबलक सुविधा असली पाहिजे. आपला प्रक्रिया उद्योगाचा पाणी हा अविभाज्य घटक आहे. त्याचप्रमाणे उद्योगाअंतर्गत कार्य करणाऱ्या मजुरांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा असली पाहिजे. उद्योग उभारणी करीत असताना यंत्रासाठी वीज लागते. वीजसुद्धा प्रक्रिया उद्योगाच्या जागेवर उपलब्ध असली पाहिजे. यासाठी मोठ्या आकाराच्या २ कढया,हलर यंत्र,टोपल्या,सुपे,बादल्या उलथणी, लोखंडी झारी / चाळणी, ॲल्युमिनीयचे मोठे टोप लागतील.