मुंबईतील भाऊचा धक्का

मुंबई हे ‘सात बेटांचे शहर’ म्हणून ओळखले जाते. अरबी समुद्राच्या काठावर असलेली ही मायानगरी ही देशातील प्रमुख बंदर आहे. आजवर अनेक घडामोडी इथेच झाल्या. आजही मुंबईमध्ये व्हिक्टोरियन शैलीतील कितीतरी वस्तू त्याच रुबाबात दिमाखात उभ्या आहेत. त्या पाहून पूर्वीच्या काळाची साक्ष मिळते. ‘माझगाव डॉक’ येथील ‘भाऊचा धक्का’ म्हणजे या दिमाखदार व्हिक्टोरियन शैलीच्या बरोबर उलटी बाजू आहे.

असंख्य मच्छीमार तिथे दिसतात. मासळी बाजार भरतो. अनेक जहाजे नांगरून पडलेली असतात. येणाऱ्या-जाणाऱ्या जहाजांचे भोंगे वाजत असतात. मुंबईची ही पण एक बाजू आहे, जिथे खूप श्रमजीवी लोक आहेत. ‘भाऊचा धक्का’ हे बंदर मुंबईच्या पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावर असलेला घाट आहे. या बंदरावर रोज अनेक जहाजे येतात, त्यात माल भरला जातो-उतरवला जातो, लोकसुद्धा जहाजाने-बोटीने प्रवास करतात.

कित्येक बॉलिवूडमधील सिनेमांचे चित्रीकरण येथे केले जाते. जुन्या मुंबईचे चित्रण हा भाऊचा धक्का अगदी नैसर्गिकरित्या करतो. पहाटे-पहाटे या परिसराला जाग येते. इथे सारे मच्छीमार येतात. पकडलेली ताजी-ताजी मासळी खरेदी करणाऱ्या लोकांची पण झुंबड उडालेली असते. हा भाग ‘भाऊचा धक्का’ म्हणून ओळखला जातो. सारे सर्रास ‘भाऊचा धक्का’ म्हणतात, कुणी ‘माझगाव डॉक’ असेही म्हणतात. पण याची उभारणी कुणी केली हे खूप कमी जणांना माहीत असेल. भाऊ लक्ष्मण अजिंक्य हे या धक्क्याचे निर्माते होत.

मुंबईच्या उभारणीत मोठमोठी दिग्गज नावे आहेत. जगन्नाथ शंकरशेठ, दादाभाई नौरोजी, जमशेदजी टाटा, फिरोजशहा मेहता,करसनदास मूळजी, डेव्हिड ससून, प्रेमचंद रायचंद अशा लोकांनी मुंबईच्या विकासाला फार मोठा हातभार लावला. यामध्येच अजून दोन नावे आहेत- एक म्हणजे डॉ.भाऊ दाजी लाड आणि भाऊ अजिंक्य लक्ष्मण ! यातील भाऊ अजिंक्य लक्ष्मण हे ‘भाऊचा धक्का’ उभारणारे दिग्गज होत. ‘पाठारे प्रभू’ समाजातील लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य ऊर्फ भाऊ रसूल यांचं जन्म रायगड जिल्ह्यातील ‘करंजा’ गावी झाला. ‘गनर्केरीएज’ कंपनीमध्ये ते कारकून म्हणून कामाला लागले. युद्धसाहित्य व यंत्र बनविणाऱ्या या ब्रिटीश कंपनीमध्ये त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर खूप विश्वासार्हता मिळविली. मालक आणि कामगार दोघेही त्यांना मानत. त्यामुळे कामगारांनी त्यांना दिलेले ‘भाऊ’ हेच नाव पुढे कायम झाले.

कॅप्टन रसूलची त्यांच्यावर विशेष मर्जी होती, म्हणून त्यांना ‘भाऊ रसूल’ असेही म्हटले जायचे. भाऊ अतिशय कष्टाळू होते. त्यावेळी मुंबई आताइतकी सुधारलेली नव्हती. माहीम, वरळी, माटुंगा, परळ, माझगाव, धाकटा कुलाबा आणि मोठा कुलाबा या सात बेटावरून लोक नोकरीसाठी ‘गनर्केरीएज’ कारखान्यात यायचे. लांबच्या अंतरामुळे त्यांचे जेवणाचे हाल होत. त्यावर उपाय म्हणून कारखाना प्रशासनाच्या मदतीने कामगारांसाठी उपाहारगृह सुरु केले. माफक दरात कामगारांना दुपारचे जेवण द्यायला भाऊंनी सुरुवात केली.अतिशय कष्टाळू आणि कल्पक असलेल्या भाऊंनी नोकरीत बढती मिळविली. इतर व्यवसायातही यश मिळविले. मुंबईत वाढणारी लोकसंख्या आणि जमा होणारा कचरा हा प्रश्न होताच. त्या कचऱ्याचे व्यवस्थापन करायचे आणि विल्हेवाट लावायची जबाबदारी घेतली. सरकारकडून त्या कामाचा ठेका मिळविला. कंपनीमधील नोकरी सोडून दिली. आता भाऊंना आकाश मोकळे होते. शहरातील डबकी, सांडपाण्याच्या खोलगट जागांवर भराव टाकून ते बुजविण्याचा ठेकाही त्यानी मिळवला. पुढे जाऊन त्यांच्या लक्षात आले की, मुंबई बंदरावर उतरताना प्रवाशांचे खूप हाल होतात. मुंबई हे नैसर्गिक बंदर असले तरीही येथे समुद्रमार्गे होणारी वाहतूक ही ‘मचवे’, ‘गलबते’ यांच्या मदतीने होत असे.

प्रवासी आगबोटी समुद्रात दूरवर उभ्या केल्या जात आणि मग प्रवाशांना ‘मचव्या’तून किंवा ‘गलबता’तून किनाऱ्यावर आणले जाई. यात खूप अडचणी येत. मग माल वाहतुकीसाठी असे धक्का उभारणे किती गरजेचे आहे, हे भाऊनी पटवून दिले. त्यावेळी ब्रिटीश सरकारकडे त्या अवाढव्य कामाला लागणारा पुरेसा पैसा नव्हता. म्हणून मालकी हक्काने बांधकाम करण्यासाठी निविदा मागविल्या गेल्या. भाऊंनी अर्ज केला. त्याकाळी ते खरोखर मोठे धाडस होते. ते भाऊंनी केले. पुढे पर्यावरण, भरती-ओहोटी यांचा बारकाईने अभ्यास करून भाऊंनी तो आराखडा शासनाला सादर केला. मर्यादित साधनसामग्री, यंत्रसामग्री, अपुरा निधी,करारातील फेरबदल, स्थानिक राजकारण अशी नाना अडथळ्यांची शर्यत पार करत त्याकाळी भाऊंनी दिड लाखाचे कर्ज ६% चक्रवाढ व्याजाने घेतले आणि काम चार वर्षात पूर्ण केले .बंदरावर येणाऱ्या-जाणाऱ्या मालासाठी सुसज्ज ‘वखार’ उभारली. अत्यंत काटेकोर व्यवस्थापन करून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी गटारे, माल वाहतुकीसाठी रस्ते,सुरक्षित तटबंदी शेड्स हे खूप बारकाईने भाऊंनी केले.

याचा परिणाम म्हणजे हे बंदर भाऊंना ५० वर्षे मक्त्याने ब्रिटीश सरकारने दिले. भाऊंनी त्याकाळचे गव्हर्नर ‘कारनॅक’ यांचे नाव त्या बंदराला द्यावे, अशी विनंती केली. ते दिलेही गेले; परंतु आजही ते बंदर ‘भाऊचा धक्का’ म्हणूनच ओळखले जाते. कोण तेही काम निष्ठेने, परिश्रमपूर्वक, कल्पकतेने केले तर ते कायमस्वरूपी जनमानसावर कोरले जाते, याचे हे मोठे उदाहरण आहे. आज भाऊ आपल्यात नाहीत, पण त्या ‘धक्क्या’च्या नावाने ते अमर झाले आहेत.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *