
महाराष्ट्रात रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील ‘कशेळी’ गावातील ‘देवघळी’ समुद्रकिनारा आल्हाददायक आहे. वैशिष्ट्यपूर्ण सूर्यमं दिर आणि या समुद्रकिनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या झालेला विकास यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये हे ‘कशेळी’ गाव पर्यटनस्थळ म्हणून प्रकाशझोतात आले आहे.समुद्रकिनारी नव्याने विकसित केलेला ‘सूर्यास्त बिंदू’ पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्यातून हौशी पर्यटकांचा ओघ वाढू लागला असून ‘देवघळी’ किनार्यावरील ‘सूर्यास्त बिंदू’ ला सध्या पर्यटकांची पहिली पसंती मिळत आहे.
मुळातच राजापूर तालुका हा सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला आणि मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला तालुका आहे. समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या या गावाला सूर्यमंदिरामुळे धार्मिक अधिष्ठान लाभले आहे. यात शांत समुद्राची भर पडली आहे.
‘देवघळी’ सागरतीरावरून समुद्रामध्ये बुडणाऱ्या सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य अधिक रोमांचक वाटते. काही वर्षांपूर्वी या किनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास झालेला नसल्याने येथे पर्यटकांचा फारसा ओढा नव्हता, मात्र दोन वर्षांपूर्वी हा भाग पर्यटनदृष्ट्या विकसित झाला. ‘देवघळी’ समुद्र किनाऱ्यावरील ‘सूर्यास्त बिंदू’ चांगल्या पद्धतीने विकसित करण्यात आला. येथे जाण्यासाठी चांगले रस्ते बनविण्यात आले. पथदीप, पर्यटकांसाठी बैठक व्यवस्था, आदी सुविधा निर्माण केल्या.

येथे काळ्या दगडांवर बसून रौद्ररूप धारण करून फेसाळत, तुषार उडवत किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटांचा अनुभव सहज घेता येतो. ‘देवघळी’ उंचावरून पाहणे आनंदमय आहे. सूर्यास्ताची अनुभूती घेण्यासाठी दरदिवशी शेकडोच्या संख्येने पर्यटक येथे भेटी देतात. रत्नागिरीकडून गोव्याकडे जाणारा सागरी महामार्ग ‘कशेळी’ येथून जातो. या महामार्गावरील ‘कशेळी बांध’ येथील दोन डोंगराच्या मधोमध असलेली खाडी आणि त्यातील जलसाठ्याचा उत्कृष्टरित्या उपयोग करीत गावचे ग्रामस्थ सुधाकर ठाकरे यांनी पर्यटकांसाठी नौकानयन सुविधा निर्माण केली आहे.
होडीमधून फेरफटका मारत असताना होडीतूनच सूर्योदय आणि सूर्यास्ताचे डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य अनुभवण्याची संधी मिळते. एका बाजूला किनाऱ्यावर समुद्राचे फेसाळत येणाऱ्या पाण्याची गाज तर दुसऱ्या बाजूला उंचच्या उंच सुळक्यासारखे डोंगर यामध्ये स्वच्छ, शांत परिसरामध्ये फिरताना पर्यटक सुखावतोन ‘कशेळी बांध’ परिसरात झाडीमध्ये खाडीभागाच्या किनाऱ्यावर विविध जातीच्या देशी-विदेशी पक्ष्यांचे वास्तव्य असते. त्यामध्ये बदक आणि बगळे प्रजातीतील पक्षी पाहता येतात.पक्ष्यांच्या शांत पाण्यातील जलक्रीडा अनुभवताना, किलबिलाट आणि हवेतील कसरती पाहताना मनाला आनंद मिळतो. काठावरील मोठमोठ्या झाडांवर सायंकाळी परतीच्या पक्ष्यांचे थवेही पहायला मिळतात.