
रत्नागिरीतील श्री शिवशंभूंचे प्रसिद्ध मंदिर म्हणजे श्री मार्लेश्वर! कोल्हापूरहून गणपतीपुळ्याला जाताना हे मंदिर लागते. कोल्हापूरपासून अंदाजे ९३ किलोमीटर अंतरावर हे स्वयंभू शंकराचे मंदिर आहे. गुहेत असलेले हे शिवमंदिर कधी बांधले, याचा उल्लेख कुठेही सापडत नाही. हिरवाईने वेढलेले हे मंदिर अतिशय नयनरम्य परिसरात आहे. पावसाळ्यामध्ये हे निसर्ग सौंदर्य अजूनच खुलून दिसते.
सह्याद्रीच्या कडेकपारीत असलेला ‘ आंबा’ घाट आहे. पावसाचे विपुल प्रमाण आणि मनमोहक सृष्टीसौंदर्य येथे पाहता येते. ‘आंबा’ घाटातील लहानमोठे धबधबे आणि हे मार्लेश्वराचे मंदिर यांनी हा परिसर खूप रम्य आणि पवित्र बनला आहे. मार्लेश्वर मंदिरात पोहोचण्यासाठी जवळपास ३०० ते ५०० पायऱ्या चढून जावे लागते. जर का या परिसरातील निसर्गसौंदर्य अनुभवायला जाऊ इच्छित असाल तर सप्टेंबर महिन्यात ठरवा ! तोच काळ उत्तम आहे.
हा भाग कोकणपट्टीमध्ये आहे. इथे पावसाळ्यात खूप पाऊस पडतो. तो केवळ कोकणातील लोकच सहन करु शकतात.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात इथला ऋतू अतिशय सुखद असतो. पाऊस कमी झालेला असतो. सुखद गारवा असतो; आणि नुकताच पावसाळा होऊन गेल्यामुळे डोंगर हिरवाईने नटलेले असतात. मार्लेश्वराचे मंदिर बघायला जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा. इथे शिवलिंगाभोवती, गुहेत, मंदिरात साप सहजपणे फिरत असतात. घाबरुन जाऊ नका. आजवर कसलीही दुर्घटना येथे घडली नाही. कुणालाही सापाने दंश केला, आणि कुणाचा मृत्यू झाल्याचे ऐकिवात नाही. मकरसंक्रांतीच्या वेळी ‘मार्लेश्वर’ गावात ‘मार्लेश्वर’ आणि ‘गिरीजादेवी’ म्हणजे शंकर-पार्वती यांचा विवाह सोहळा दरवर्षी उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जातो. श्रावण महिना, नागपंचमी आणि महाशिवरात्री या काळात खूप भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.

‘बाव’ नदीत उगमस्थान असलेला एक धबधबा ‘मार्लेश्वर’ किंवा ‘धारेश्वर’ धबधबा म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात असणारा झकास धबधबा असेच या धबधब्याचे वर्णन करतात. या धबधब्याचे पाणी औषधी गुणधर्म युक्त आहे, असे मानले जाते.
या पाण्यात गंधकाचा अंश आहे. बरेचसे त्वचारोग या पाण्यामुळे कमी होतात, अशी मान्यता आहे. हे पाणी तहान लागली तरी प्यायला हरकत नाही, पण आपण बाटलीत भरून नेले तर नंतर त्याची चव कडू झालेली असते. धबधब्याने या मंदिराचा परिसर अत्यंत रमणीय आणि आकर्षक बनला आहे. स्वतःची गाडी असेल तर कोल्हापूरपासून ९३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्लेश्वरला जाण्यासाठी कोल्हापूरातून पन्हाळामार्गे ‘आंबा’ घाटात जाऊ शकता; आणि मार्लेश्वरला पोहोचू शकता.
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावर रत्नागिरी येथे जाणाऱ्या बसेसची सोय आहे. तिथून आपण बसनेही जाऊ शकता. काही लोक रत्नागिरी येथे जाताना देवरुखला उतरतात. मार्लेश्वरपासून १५ किलोमीटर अंतरावर हा फाटा आहे, पण तो फार लांबचा प्रवास होतो. त्यापेक्षा पन्हाळा मार्गे जाणे केव्हाही चांगले! खरेच, एकदा जाऊन निसर्गाच्या शांत सानिध्यात असलेला शिवशंकर मार्लेश्वर नक्की बघा.