महाराष्ट्रातील प्राचीन स्थळ नाशिक

नाशिक हे महाराष्ट्रातील एक धार्मिक शहर आहे. दर 12 वर्षांनी येथे कुंभमेळ्याचे आयोजन होते. नाशिक हे महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या काठावरील एक शहर आहे. अनेक मंदिरे येथे आहेत.हिंदू पौराणिक कथांचे ठिकाण म्हणूनही हे प्रसिद्ध आहे; जेथे रावणाची बहीण शूर्पणखा हिचा लक्ष्मणाने शिरच्छेद केला होता. नाशिकमध्ये अनेक मंदिरे, किल्ले, धबधबे आणि द्राक्षबागा आहेत. नाशिक हे द्राक्षबागांसाठी प्रसिद्ध आहे. हे धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांसाठी प्रसिद्ध आहे.

त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक स्थळ नाशिकपासून २७ कि.मी. अंतरावर आहे. ‘अंजनेरी’ हे हनुमानाचे जन्मस्थान नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर आहे. ‘सप्तशृंगी’ देवी हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. हे स्थळ नाशिकपासून ५२ कि.मी. अंतरावर आहे. ‘पांडवलेणी’ ही सुमारे १२०० वर्षांची जुनी लेणी नाशिक शहरात आहेत. दादासाहेब फाळके यांचे स्मारक पांडवलेण्यांजवळ आहे. ‘राम कुंड’ हे गोदावरी नदीवरील एक कुंड आहे. कुंभमेळ्याच्या पर्वात येथे स्नान केल्याने पापे नाहिशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ‘सीता गुंफा’ ही राम-सीता यांची वनवासातील वास्तव्याची जागा आहे. ‘काळाराम’ मंदिर हे रामाचे काळ्या पाषाणात बनविलेले प्राचीन मंदिर आहे.


सादिकशाह हुसेनी बाबा दर्गा येथे आहे. ‘कळसूबाई’ शिखर हे देवीचे स्थान व महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.
‘सोमेश्वर’ येथे प्रसिद्ध शिवमंदिर आहे, तसेच मंदिरापासून गंगापूर गावाच्या दिशेने गेल्यास थोड्याच अंतरावर नवीन ‘तिरुपती बालाजी’ मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरालगतच असलेला धबधबा ‘सोमेश्वरचा धबधबा’ म्हणून प्रसिद्ध आहे. सातपूरनजीक ‘चुंचाळे’ गावात प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे.कपालेश्वर मंदिर हे नंदी नसलेले शिवमंदिर आहे. तसेच मुक्तीधाम (नाशिक रोड),
भक्तीधाम (पेठ नाका),नवश्या गणपती येथे असून सुमारे १२०० वर्ष जुनी ‘चामर’ लेणी आहेत. रामशेज किल्ला, इच्छामणी गणपती,समर्थ रामदासांनी स्थापलेल्या मारूतीचे मंदिर येथे असून समर्थांचे १२ वर्षे वास्तव्य येथे होते.

‘ब्रह्मगिरी’ हे गोदावरीचे उगमस्थान आहे. त्याजवळच श्रीचक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले स्थान आहे. ‘पंचवटी’त अहिल्यादेवी पुलाजवळ श्रीचक्रधर स्वामींचे मंदिर आहे. नाशिक जिल्ह्यात ‘दिंडोरी’ तालुक्यातील पूर्व भागात संत पाटील बाबा महाराज मंदिर आणि त्यांनी बांधलेले पुरातन श्री विठ्ठल मंदिर हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. संत पाटील बाबांनी अठराव्या शतकात निवृत्तीनाथ महाराज समाधीचा शोध लावला. त्यांनी महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय भरभराटीस आणला.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *