डोळ्यात पाणी आणणारा कांदा
कांदा हे व्यापारीदृष्ट्या सर्वात महत्वाचे भाजीपाला पीक आहे. भारतीयांच्या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणाऱ्या राज्यात क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 1.00 लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा हेक्टरी कांदा पिकविण्याबाबत प्रसिध्द आहेत. मराठवाडा, विदर्भ व कोकणातसुध्दा काही जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे, तर सबंध भारतात कांदा पिकविण्यात प्रसिध्द आहे. एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रातील 37 टक्के तर भारतातील 10 टक्के कांद्याचे उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात घेतले जाते.

कांदा हिवाळी हंगामातील पीक असून महाराष्ट्रातील सौम्य हवामानात कांद्याची 2 ते 3 पिके घेतली जातात. कांदा लागवडीपासून 1 ते 2 महिने हवामान थंड लागते. कांदा पोसायला येताना तापमानातील वाढ कांदावाढीस उपयुक्त असते. पाण्याचा निचरा असणारी भुसभुशीत जमिन व सेंद्रीय खतांनी परिपूर्ण असलेली मध्यम ते कसदार जमिन कांद्याला चांगली मानवते. जमिनीची उभी- आडवी नांगरणी करावी. ढेकळे फोडून जमिन भुसभुशीत करावी. जमिनीत हेक्टरी 40 ते 50 टन शेणखत मिसळावे.
महाराष्ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर, रब्बी हंगामात नोव्हेंबर ते फेब्रूवारी आणि उन्हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्यात करतात. ‘बसवंत ७८०’,’ एन- 2-4-१’, ‘पुसा रेड’ या कांद्याच्या जाती आहेत. हेक्टरी कांद्याचे 10 किलो बियाणे पुरेसे असते. कांद्यावरील प्रमुख रोग म्हणजे ‘करपा’ होय. हा रोग बुरशीपासून होतो. पातीवर लांबटगोल तांबूस चट्टे पडतात. शेंड्यापासून पाने जळाल्यासारखी दिसतात. खरीप कांद्यावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. ‘फूलकिडे’ किंवा ‘अळ्या’ तसेच अगदी लहान आकाराचे किटक पातीवरील तेलकट पृष्ठभागात खरडतात. त्यात स्त्रवणारा रस शोषतात. त्यामुळे पातीवर पांढरे ठिपके पडतात.

कांद्याच्या पीक लागवडीनंतर 3 ते 4.5 महिन्यात पीक काढणीस तयार होते. कांद्याची पात पिवळी पडून कांदा मानेत पिवळा पडतो, व पात आडवी पडते. यालाच ‘मान मोडणे’ असे म्हणतात. 60 ते 75 टक्के माना मोडल्यावर कांदा काढणीस पक्व झाला असे समजावे. कुदळीच्या सहाय्याने आजूबाजूच्या जमिनी सैल करून कांदे उपटून काढावेत. काढणीनंतर 4, 5 दिवसांनी कांदा पातीसकट शेतात लहान-लहान ढिगाऱ्याच्या रूपाने ठेवावा. नंतर कांद्याची पात व मळे कापावे. पात कापताना 3 ते 4 सेमी. लांबीचा देठ ठेवून पात कापावी. यानंतर कांदा 4 ते 5 दिवस सावलीत सुकवावा. कांद्याचे हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.