कोणत्याही गोष्टीची बातमी करणे हा उद्देश नाही. नकारात्मक मजकूर देण्यापेक्षा, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच आमचा उद्देश आहे. दिवसभर त्याच त्याच बातम्या दाखविणे, एकाच्या वक्तव्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया घेणे आणि कोणाच्याही खासगी आयुष्यात दखल देणे, आम्हाला मान्य नाही. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. स्वत: देव, देश आणि धर्माचे पुरस्कर्ते असताना इतर जाती-धर्माचा आदर पुरेपुर करतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.
उद्देश काय?
मराठी भाषा, मराठी माणुस आणि मराठी राष्ट्र हिताची वृध्दी, प्रगती आणि समृध्दी हेच उदिष्ट आहे. राजकारण ते समाजकारण, व्यवसाय ते उद्योग आणि प्रशासनापासुन सरकारपर्यंत मराठी मुलुखाच्या सोबत राहू. माध्यमांचा फायदा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवून शिक्षण-आरोग्य-रोजगारासारख्या अत्यावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी प्रत्यक्ष काम करु. समाजाशी संबंधीत प्रश्न आणि गरजा यावर वास्तववादी तोडगा काढू. अर्थव्यवस्था, कायदा व सुव्यवस्था आणि निरोगी समाजव्यवस्थेसाठी आमचे योगदान असले पाहिजे. अपघात, बलात्कार, आत्महत्या आणि कोणत्याही आपत्तीची बातमी नं करता त्यातील बळींच्या पुनर्वसनासाठी झटू. उठसुठ सरकारकडून अपेक्षा नं करता व सतत सरकारला दोष नं देता माध्यम म्हणून आपली सामाजीक जबाबदारी पार पाडायची आहे.
करणार काय?
विविध विषय आणि क्षेत्रांतील बातम्या, माहिती, विशेष अहवाल, तज्ञांच्या मुलाखती या दृक-श्राव्य माध्यमात आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. जगभरातील संधी मराठी माणसांपर्यंत पोहचविली जाईल. त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शनही उपलब्ध असेल. आम्हाला काय वाटतं यापेक्षा वाचक - दर्शक - श्रोत्यांना जे हवं, जे हिताचं, उपयोगाचं, ते दिलं जाईल. समाजातील प्रत्येक घटकाच्या हाकेला उभं राहून, समाजाला आमचा आधार वाटायला हवा असा मानस आहे. वेब आणि समाज माध्यमांवर प्रस्थापित होणे, हा या वाहिनीच्या विस्तार वाढीतला पहिला टप्पा आहे.
उदात्त हेतुने निस्वार्थीपणे कार्य करणारी माणसे, दखल नं घेतले गेलेले, अव्याहतपणे राबणारे अदृष्य हात, संस्था, अनेक क्षेत्रात उत्तुंग शिखर गाठलेल्या कार्यकर्तुत्वाला सन्मानीत करण्यात येणार आहे.
इथे समस्यांचे समाधान व पुढे जाण्याचा मार्ग मिळेल. अडचणीत असताना रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नातीच कामाला येतात, असा अनेकांचा अनुभव आहे. अश्याच जोडलेल्या नात्यांचा हा परिवार आहे.